श्रावणातील कृष्ण अष्टमीला श्रीकृष्ण जन्माचा उत्सव करून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. मध्यरात्री श्रीकृष्णजन्माचे स्मरण करून, एकत्र येऊन उपवास करून भाविक हा दिवस साजरा करतात. दुसर्या दिवशी ठिकठिकाणी उंचावर मडक्यात दही ठेवून, मडके दोरीने उंचावर बांधतात. तरुणांनी एकमेकांच्या आधाराने मानवी मनोरा करून ते मडके (हंडी) फोडण्याची एक प्रथा आहे. त्याला ‘दहीहंडी’ म्हणतात. अलीकडे ‘दहिहंडी’ हा एक `आंतरराष्ट्रीय इव्हेंट' बनला आहे. मानवी मनोरा करणारे, हंडी फोडणारे ‘गोविंदा’ यांची फार चढाओढ सुरू झाली आहे. हौस, दंगा, आनंदोत्सव याबरोबरच त्याला स्पर्धा, प्रसिद्धी, प्रायोजक या माध्यमांतून व्यवसायाचे रूपही येऊ लागले आहे. तरुणांची संघटित शक्ती ही या उत्सवाची प्रमुख जमेची बाजू आहे. मुंबई हे या उत्सवाचे मोठे, प्रमुख केंद्र होय.
श्रीकृष्ण म्हणजे खट्याळ, खोडकर, दही-दूध-लोणी चोरून खाणारा अशी त्याची प्रतिमा पिढ्या-न-पिढ्या सांगितली जाते. अनेक गाणी-गोष्टी त्याच्या या लीलांवरच रचलेल्या आहेत. श्रीकृष्णाने त्याच्या सवंगड्यांसह, मनोरे करून दही-दूध-लोण्याच्या हंड्या फोडल्याच्या कथा प्रचलित आहेत. अशा श्रीकृष्णाची-दुष्टांचा संहार करणार्या श्रीकृष्णाची-आठवण करण्याचा हा दिवस. काही कथांमुळे श्रीकृष्णाची प्रतिमा लहानपणापासून प्रत्येकाच्या मनात तयार होते. तरुणांनी चपळाईने, संघटितपणे उंचावरचे दही खाली काढण्याच्या निमित्ताने साहसी वृत्ती जागवावी अशाही पद्धतीने या उत्सवाकडे पाहिले जाते.
गायी-वासरे चरण्यासाठी रानात आणि पाण्यासाठी यमुनेच्या तीरावर घेऊन जाणारे सर्व गो-पालक आपापले खाद्यपदार्थ एकत्र करून मजेत खात असावेत अशी कल्पना केली जाते. हाच गोपाळकाला होय. `गोकुळअष्टमी' च्या दिवशीच संध्याकाळी मंदिरांत काल्याचे कीर्तन असते. नंतर प्रसाद म्हणून पोहे-काकडी-डाळ-दाणे-चुरमुरे असे एकत्र करून प्रसाद म्हणून वाटले जाते. प्रत्येकाने एक एक पदार्थ नेऊन, सर्वांचे पदार्थ एकत्र करून अनेक ठिकाणी रात्रभर भजन करण्याचीही प्रथा आहे. गोपाळकाला करून हा प्रसाद सर्वांना दिला जातो.
